Current Affairs of 25 September 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (25 सप्टेंबर 2017)

चालू घडामोडी (25 सप्टेंबर 2017)

डॉ. श्रीराम लागू यांना यंदाचा महर्षी पुरस्कार जाहीर :

  • नवरात्रौ महोत्सव समितीचे अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी अशी माहिती दिली की, ज्येष्ठ अभिनेतेरंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांना यंदाचा महर्षी पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • हा पुरस्कार 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
  • तसेच हा पुरस्कार पुणे नवरात्रौ महोत्सव समितीतर्फे दर वर्षी दिला जातो. यापूर्वी भारतरत्न पं. भीमसेन जोशी, डॉ. रघुनाथ माशेलकर, ह. भ. प. बाबा महाराज सातारकर, किशोरी आमोणकर, पं. हृदयनाथ मंगेशकर, डॉ. विजय भटकर, लीला पुनावाला यांच्यासह मान्यवरांना महर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित करण्यात आलेल्या पुणे नवरात्रौ महोत्सवात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. यावेळी ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

भारत अमेरिकेकडून ड्रोन खरेदी करणार :

  • अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस हे या आठवड्यात भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण संबंधांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
  • इतकेच नाही तर 22 मानवरहित ड्रोन खरेदीच्या योजनेलाही या दौऱ्यादरम्यान मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
  • समुद्री सीमांवर नजर ठेवण्यासाठी भारत या ड्रोनचा वापर करण्याची शक्यता आहे. जर या योजनेला मंजुरी मिळाली तर भारतीय नौदलाकडे जगातील सर्वात प्रगत शैलीचे ड्रोन असतील यात शंकाच नाही.
  • या ड्रोनद्वारे चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या कारवायांना उत्तर देणे शक्य होणार आहे.
  • ड्रोनची ताकद भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढवण्यात हातभार लावणार आहे.
  • भारताच्या समुद्री सीमारेषांवर चीनने नजर ठेवण्यास सुरूवात केली आहे, त्याचमुळे मॅटिस यांच्या भारत दौऱ्यादरम्यान ड्रोन कराराला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
  • दोन्ही देशांमधील सुरक्षा करार वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने जेम्स मॅटिस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा होणार आहे.

ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांचे निधन :

  • पत्रकारिता आणि साहित्याच्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचे 25 सप्टेंबर रोजी निधन झाले. ते 76 वर्षांचे होते.
  • साधू यांच्या निधनामुळे पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. वयोमानामुळे गेल्या काही दिवसांपासून साधू यांची प्रकृती खालावली होती. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता.
  • अरुण साधू यांनी केसरी, माणूस, इंडियन एक्स्प्रेस अशी विविध वृत्तपत्रे व साप्ताहिकांतून पत्रकारिता केली होती. सहा वर्षे ते पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख होते.
  • 80 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मानही त्यांना मिळाला होता.
  • कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान व अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
  • तसेच साधू यांनी झिपर्‍या, तडजोड, त्रिशंकू, बहिष्कृत, मुखवटा, मुंबई दिनांक, विप्लवा, शापित, शुभमंगल, शोधयात्रा, सिंहासन, स्फोट या कादंबऱ्या लिहिल्या आहेत.

चीनकडून उत्तर कोरियावर निर्बंध :

  • उत्तर कोरियाला करण्यात येणाऱ्या तेलाच्या निर्यातीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय चीनने घेतला आहे; तसेच उत्तर कोरियातील कापडाच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे.
  • अणुचाचण्या आणि क्षेपणास्त्र चाचण्या केल्यामुळे उत्तर कोरियावर निर्बंध घालण्यासाठी चीनवर जागतिक पातळीवरून दबाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर चीनने हा निर्णय घेतला आहे.
  • उत्तर कोरियाचा सर्वांत निकटवर्ती देश चीन असून, देशाच्या एकूण परकी व्यापारापैकी 90 टक्के व्यापार चीनशी होतो.
  • चीनने आता कोळसा, लोहखनिज, सागरी खाद्य आणि अन्य वस्तूंची उत्तर कोरियातून होणारी आयात थांबविली आहे.
  • उत्तर कोरियाने अणुचाचण्या व क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्याने संयुक्त राष्ट्रसंघाने निर्बंध लादले आहेत.
  • चीन हा उत्तर कोरियाचा व्यापारातील सर्वांत मोठा भागीदार आहे. चीनने कापड आयातीवर बंदी घातल्याने उत्तर कोरियाला मोठा फटका बसणार आहे.

मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रह्मण्यम यांच्या कार्यकाळात वाढ :

  • केंद्र सरकारने मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांचा कार्यकाळ 1 वर्षांनी वाढवला आहे. ते ऑक्टोबर 2018 पर्यंत पदावर कायम राहतील, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले.
  • ऑक्टोबर 2014 मध्ये पुढील तीन वर्षांसाठी सुब्रह्मण्यम यांची भारताच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती.
  • अरविंद सुब्रह्मण्यम यांनी पदवीपूर्व शिक्षण हे दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये झाले. तर अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी एमबीए पूर्ण केले. यानंतरचे एम.फिल. आणि डी. फिलचे शिक्षण त्यांनी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठातून पूर्ण केले आहे.
  • 2008 मध्ये ‘इंडिया टर्न : अंडरस्टँडिंग द इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन’ आणि 2011 मध्ये ‘इक्लिप्स : लिव्हिंग इन शॉडो ऑफ चायनाज इकॉनॉमिक डॉमिनन्स’ ही दोन पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
  • तसेच 2012 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘हू नीड्स टू ओपन द कॅपिटल अकाउंट्स?’ या पुस्तकाचे सह-लेखक आहेत.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.