Current Affairs of 29 October 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (29 ऑक्टोबर 2015)

चालू घडामोडी (29 ऑक्टोबर 2015)

परकीय नागरिकासाठीच्या सरोगसी सेवेवर बंदी :

  • परकीय नागरिकासाठीच्या सरोगसी सेवेवर बंदी घालण्याचा केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत असून, त्यामुळे अपत्य सुखासाठी त्यांना आता भारताचे दार ठोठावता येणार नाही.
  • अपत्य प्राप्तीसाठी सरोगेट मदरच्या शोधात भारतात येणाऱ्या परकी नागरिकांच्या संख्येत मागील काही दिवसांमध्ये मोठी वाढ झाली होती.
  • भारतातील सरोगसी बाजारपेठेतील उलाढाल नऊ अब्ज रुपयांवर पोचली असून, दरवर्षी तिच्यामध्ये 20 टक्‍क्‍यांची वाढ होत असल्याचे दिसून आले.
  • भारतामध्ये सरोगसीसंदर्भात कायदे नसल्याने गरीब महिलांचे शोषण होत असल्याचा दावा काही तज्ज्ञांनी केला होता.
  • केंद्र सरकारने याअनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात व्यावसायिक सरोगसीचे आम्ही समर्थन करत नसल्याचे म्हटले आहे.
  • कोणतेही परदेशी दांपत्य सरोगसी सेवेचा लाभ घेऊ शकत नाही, ही सेवा केवळ भारतीयांपुरतीच मर्यादित आहे, असे यात नमूद करण्यात आले आहे.
  • भारतामध्ये सरोगसी सेवेसाठी सर्वसाधारणपणे 18 ते 30 हजार डॉलर मोजले जातात.
  • त्यातील आठ हजार डॉलर हे सरोगेट मदरला दिले जातात.

दहा चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी राष्ट्रीय पुरस्कार केले परत :

  • देशातील वाढती असहिष्णुता, “एफटीआयआय”मधील वाद आणि ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध करत आज दहा चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी त्यांचे राष्ट्रीय पुरस्कार परत केले.
  • यामध्ये दिवाकर बॅनर्जी आणि आनंद पटवर्धन यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.
  • देशातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात साहित्यिक आपले पुरस्कार परत करत असताना आता चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनीही पुरस्कार परत करण्यास सुरवात केली आहे.
  • दिबाकर बॅनर्जी, पटवर्धन यांच्यासह परेश कामदार, निष्ठा जैन, लिपिका सिंह, कीर्ती नखवा, हर्ष कुलकर्णी आणि हरी नायर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुरस्कार परत करत असल्याची घोषणा केली.

महाराष्ट्राकडे बारा टक्‍क्‍यांहून अधिक भरती योग्य युवक :

  • भारतीय लष्करात जवान भरतीसाठी 2011च्या जनगणनेवर आधारित भरती योग्य पुरुषांचे प्रमाण मोजले जाते.
  • यात 0.8 टक्के प्रमाणासह गोवा सर्वांत पिछाडीवर आहे, तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राकडे तब्बल बारा टक्‍क्‍यांहून अधिक भरती योग्य युवक आहेत, अशी माहिती भारतीय लष्कराच्या भरती विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल आर. एन. नायर यांनी दिली.
  • भरतीसाठी लष्करामार्फत भरतीयोग्य पुरुष संख्या (रिक्रूटेबल मेल पॉप्युलेशन) मोजली जाते.
  • ठराविक वयोगटातील पुरुषांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हे प्रमाण मोजले जाते.
  • त्यावरून प्रत्येक राज्यासाठी वार्षिक भरती कोटा जाहीर केला जातो.

नेपाळच्या अध्यक्षपदी विद्या भंडारी विजयी :

  • नेपाळच्या अध्यक्षपदी सत्तारूढ नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्‍सिस्ट-लेनिनिस्ट) (सीपीएन-यूएमएल) विद्या भंडारी विजयी झाल्या.
  • नेपाळच्या अध्यक्षपदी येणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
  • नेपाळी कॉंग्रेसचे उमेदवार कुलबहादूर गुरुंग यांचा त्यांनी शंभरपेक्षा जास्त मतांनी पराभव केला.
  • विद्या भंडारी यांना 327, तर गुरुंग यांना 214 मते मिळाली.
  • नेपाळ प्रजासत्ताक झाल्याची घोषणा झाल्यावर 2008 मध्ये यादव पहिले अध्यक्ष झाले होते.
  • भंडारी यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा संसदेचे अध्यक्ष ओन्सारी घराटी यांनी केली.

पेयजल पाणीपुरवठा संजीवनी योजना राज्यात चालू :

  • राज्यातील पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज देयकांत सवलत देण्याबाबतची पेयजल पाणीपुरवठा संजीवनी योजना राज्यात चालू वर्षाच्या जुलैपासून लागू करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळात घेण्यात आला.
  • पहिल्या टप्प्यात राज्यातील दुष्काळी भागांत अटी शिथिल करून ही योजना राबविण्यात येणार आहे.
  • इतर भागांत दुसऱ्या टप्प्यात ही योजना राबविण्यासाठीचे निकष ठरविण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार आहे.
  • या उपसमितीमध्ये अर्थमंत्री, ऊर्जामंत्री आणि पाणीपुरवठा मंत्री यांचा समावेश असणार आहे.
  • या योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनांना मूळ थकबाकीची 50 टक्के रक्कम एकरकमी किंवा दहा समान मासिक हप्त्यांत भरावी लागणार आहे.
  • महावितरण कंपनीतर्फे उर्वरित 50 टक्के व्याज व दंडाची रक्कम माफ करण्यात येणार आहे.
  • या योजनेत सहभागी ग्राहकांनी जुलै 2015 पुढील बिले निश्‍चित कालावधीत भरणे आवश्‍यक आहे.
  • तसेच, 80 टक्के पाणीपट्टी वसुली होणे आणि पाणीचोरीचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असणे आवश्‍यक आहे.
  • पाणीपुरवठा ही अत्यावश्‍यक नागरी सुविधा असल्याने संबंधित ग्रामपंचायतींना चौदाव्या वित्त आयोगांतर्गत त्यांना मिळणाऱ्या निधीतून जिल्हास्तरावरील महावितरण कंपनीस सदर थकबाकीची रक्कम देता येईल.
  • ग्रामविकास विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि नगरविकास विभाग यांच्या अखत्यारीतील पाणीपुरवठा योजनांबाबतीत सुधारित दरडोई पाणीपट्टी एका महिन्याच्या आत घोषित करावी लागणार आहे.

उद्योग व्यवसायासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात भारताची प्रगती :

  • उद्योग व्यवसायासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात भारत प्रगती करत असून यासंदर्भात जागतिक बॅंकेने जाहीर केलेल्या यादीमध्ये भारताने पूर्वीपेक्षा वरचे मिळविले आहे.
  • ‘डोईंग बिझनेस – मेजरिंग रेग्युलेटरी क्वालिटी ऍण्ड इफिशिअन्सी’ या नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
  • त्यामध्ये जगभरातील देशांमध्ये व्यवसायासाठी आवश्‍यक पायाभूत सुविधांचा, कर व्यवस्थेचा, कर्मचाऱ्यांना असणाऱ्या सोयीसुविधांचा, तेथील व्यावसायिक करारांचा आढावा घेण्यात आला आहे.
  • त्यामध्ये प्रत्येक देशातील परिस्थितीनुसार त्याचे स्थान ठरविण्यात आले आहे.
  • यामध्ये भारत 130 व्या क्रमांवर पोचला आहे.
  • यापूर्वी अशाचप्रकारच्या अहवालामध्ये भारताचे स्थान 142 व्या क्रमांकावर होते. आशिया खंडातील हॉंगकॉंगने यादीत “टॉप 10” मध्ये स्थान मिळविले आहे.

व्यवसाय करण्यासाठी सर्वाधिक अनुकूल असलेले “टॉप 10” देश

  1. सिंगापूर
  2. न्यूझीलंड
  3. डेन्मार्क
  4. कोरिया प्रजासत्ताक
  5. हॉंगकॉंग
  6. युके
  7. यु.एस.
  8. स्वीडन
  9. नॉर्वे
  10. फिनलॅण्ड

आशियामधील प्रमुख देश आणि त्यांचे स्थान

  1. भारत (130)
  2. पाकिस्तान (138)
  3. नेपाळ (99)
  4. बांगलादेश (174)
  5. चीन (84)
  6. श्रीलंका (107)

जयवंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्कारासाठी सुहासिनी देशपांडे यांची निवड :

  • रंगभूमीदिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या जयवंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ रंगकर्मी सुहासिनी देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे.
  • पुरस्कार वितरण सोहळा 5 नोव्हेंबरला होणार आहे.
  • कविता विवेक जोशी, शमा अशोक वैद्य यांना माता जानकी पुरस्कार, रजनी भट यांना प्रपंच लक्ष्मी पुरस्कार, वंदना व रवींद्र घांगुर्डे यांना लक्ष्मी-नारायण पुरस्कार, तर भारती बाळ गोसावी यांना चित्तरंजन कोल्हटकर स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठात पदार्थाच्या वेगळ्या रचनेचा शोध :

  • वैज्ञानिकांनी पदार्थाच्या वेगळ्या रचनेचा शोध लावला असून त्यात इलेक्ट्रॉन्सची मांडणी वेगळ्या क्रमाने असते, त्यामुळे नवीन इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्मिती करता येऊ शकते.
  • अनेक धातूंमध्ये अतिवाहकता हा गुणधर्म उच्च तपमानालाही असतो, तो का असतो याचा उलगडा यात होणार आहे.
  • प्रतिरोधाशिवाय वीज वाहून नेली जाते त्याला अतिवाहकता म्हणतात. काही पदार्थात शंभर अंश तपमानालाही ती असू शकते.
  • अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील सहायक प्राध्यापक डेव्हीड सिए यांनी सांगितले, की हा शोध अनपेक्षित होता व त्यात आधीचा कुठलाही सिद्धांत नसतानाही द्रव्याची ही अवस्था सापडली आहे.
  • ठल्याही धातू किंवा पदार्थाचे स्थूल भौतिक गुणधर्म यातून उलगडतात.
  • मल्टीपोलर ऑर्डर या तंत्राने या द्रव्यावस्थेचा शोध लागला आहे.
  • काही स्फटिक असे असतात, की ज्यांच्या अंतर्गत भागात इलेक्ट्रॉन काही विशिष्ट स्थितीत फिरतात व त्यात पुनरावर्ती पद्धतीने विद्युतभार साठत जातो व त्यामुळे एका विशिष्ट क्रमवारीत भारित इलेक्ट्रॉन दिसतात.
  • यात विद्युतभाराशिवाय इलेक्ट्रॉन्सना स्वत:ची गिरकी असते. जेव्हा इलेक्ट्रॉन समांतर रेषेत गिरकी घेतात (उदा. स्फटिक) ते फेरोमॅग्नेट हा चुंबक प्रकार तयार करतात.
  • फेरोमॅग्नेटचा वापर आपण प्रशीतक म्हणजे फ्रीजमध्ये वापरतो व त्याचाच वापर क्रेडिट कार्डच्या पट्टीवर केलेला असतो.
  • गिरकीला परिमाण व दिशा असल्याने ते आकडय़ात सांगता येतात.
  • जर विरोधी इलेक्ट्रॉन गिरकी घेत असतील, तर एक उत्तरेकडे एक दक्षिणेकडे असतो त्याला मॅग्नेटिक क्वाड्रापोल म्हणतात.
  • विविध ध्रुवीय अवस्था या शोधणे अवघड असते.
  • सिए यांनी सांगितले, की जी नवी अवस्था शोधली आहे, त्यात बहुध्रुवीय अशी इलेक्ट्रॉन रचना असते व ती स्ट्राँटियम इरिडियम ऑक्साइड (एसआर२ एलआर ओ 4) हा घटक संश्लेषित संयुग असून त्याला इरिडेटस असे म्हणतात.
  • बहुध्रुवीय इलेक्ट्रॉन रचना आणखी अनेक पदार्थाची असण्याची शक्यता असते. हे संशोधन ‘नेचर फिजिक्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेले असते.

जागतिक क्रमवारीत भारताचे मानांकन सुधारले :

  • विरोधकांकडून टीकेचा भडीमार होत असला, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या पाठीवर जागतिक बॅंकेने कौतुकाची थाप मारली आहे.
  • देशात व्यवसाय सुरू करण्यासाठी जाचक अटी वगळून पोषक स्थिती निर्माण करण्यात (ईझ ऑफ डुईंग बिझनेस) मोदी सरकार यशस्वी ठरले असून, त्यामुळे जागतिक क्रमवारीत भारताचे मानांकन सुधारले आहे.
  • एकूण 189 देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक 130 वर गेला आहे.
  • जागतिक क्रमवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत भारत 12 स्थाने वर सरकला आहे.
  • ‘डूईंग बिझनेस 2016’ हा वार्षिक अहवाल जागतिक बॅंकेकडून नुकताच प्रसिद्ध करण्यात आला.
  • अहवालातील क्रमवारीत सिंगापूर पहिल्या स्थानावर आहे.
  • याचाच अर्थ व्यवसाय सुरू करण्यासाठी सिंगापूरमध्ये अत्यंत पोषक स्थिती आहे.
  • यादीत त्यानंतर न्यूझिलंड, डेन्मार्क, दक्षिण कोरिआ, हाँगकाँग, ब्रिटन आणि अमेरिकेचा क्रमांक आहे.
  • यादीमध्ये चीन 84 व्या स्थानावर असून, पाकिस्तान भारतापेक्षा खाली 138 व्या स्थानावर आहे. पाकिस्तानच्या क्रमवारीत गेल्यावर्षीच्या तुलनेत घसरण झाली आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.