Current Affairs of 24 October 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (24 ऑक्टोबर 2017)

चालू घडामोडी (24 ऑक्टोबर 2017)

पंतप्रधानांच्या हस्ते गुजरातमध्ये रो-रो फेरीचे लोकार्पण :

  • गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 22 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. मोदी सर्वांत प्रथम भावनगरला पोहोचले. त्यांनी भावनगर जिल्ह्यात घोघा-भरूच आणि दाहेज दरम्यान 615 कोटी रूपयांची ‘रोल ऑन, रोल ऑफ (रो-रो)’ नौका सेवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले.
  • नव्या संकल्पाबरोबर नवा भारत, नव्या गुजरातच्या दिशेने एक अनमोल भेट घोघाच्या भूमीवरून संपूर्ण भारताला मिळत आहे. हा फक्त भारतच नव्हे तर दक्षिण आशियातील सर्वांत मोठा प्रकल्प असल्याचे ते म्हणाले.
  • रस्ते मार्गाने दोन्ही शहरातील अंतर हे 310 किमी इतके आहे. पण या नौका सेवेमुळे हे अंतर घटून 30 किमी इतके होईल.
  • तसेच पर्यावरणाचे नाव पुढे करत रो-रो सेवेत अडथळा आणण्यात आल्याचे सांगत भविष्यात ही सेवा मुंबईपर्यंत नेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

नासा करणार दुर्मीळ छायाचित्रांचा लिलाव :

  • चंद्रावरचे दुर्मीळ फोटो, नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर ठेवलेल्या पहिल्या पावलाचा फोटो तसेच इतर अनेक दुर्मीळ फोटोंचा लिलाव नासा करणार आहे.
  • 31 ऑक्टोबरपासून हा लिलाव सुरू होणार आहे. ‘CNN’ या वृत्तवाहिनीने या संदर्भातले ट्विट केले आहे.
  • अंतराळवीरांनी काढलेल्या अनेक दुर्मीळ छायाचित्रांचा समावेश यामध्ये आहे. नासाची चांद्र मोहीम आणि तिथून परतत असताना काढलेले फोटो यांचा लिलाव सुरू करण्यात येणार आहे.
  • लिलावात एका फोटोसाठी कमीत कमी 9 हजार डॉलरची बोली लागू शकते असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. या फोटोंमध्ये एकूण 446 फोटोंचा समावेश आहे.
  • अंतराळवीरांनी चंद्रावरच्या हालचाली आणि तिथून परतत असतानाच्या आठवणी त्यांच्या कॅमेरात कैद केल्या. त्यांनी काढलेले हे फोटो विलक्षण अनुभव देणारे आहेत.
  • पाच दशकांनी या फोटोंचा लिलाव होणार आहे. वैज्ञानिक महत्त्वासोबतच ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे हे सगळेच फोटो कौतुकास्पद ठरले आहेत.
  • तसेच या फोटोंचा लिलाव 31 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती स्किनर ऑक्शनर्स अँड अप्रेजर्स यांनी दिली आहे.

जपानच्या निवडणुकीत शिंझो आबे यांचा विजय :

  • जपानमध्ये 22 ऑक्टोबर रोजी झालेल्या मध्यावधी निवडणुकीत पंतप्रधान शिंझो आबे यांनी शानदार विजय मिळवला. आबे यांच्या नेतृत्त्वाखालील युतीने कनिष्ठ सभागृहात दोन तृतीयांश जागा जिंकल्या आहेत.
  • तसेच याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आबे यांचे अभिनंदन केले आहे. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक असल्याचे मोदींनी म्हटले.
  • ‘माझे प्रिय मित्र शिंझो आबे यांचे निवडणुकीतील विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन. त्यांच्यासोबत भारत-जपानचे संबंध आणि दृढ करण्यासाठी मी उत्सुक आहे,’ असे ट्विट मोदींनी केले आहे.
  • ‘शेजारच्या उत्तर कोरियाचे नेते किंम जोंग उन यांच्या आक्रमक धोरणाचा मुकाबला करण्यासाठी देशात अधिक भक्कम जनाधार असलेले सरकार असणे आवश्यक आहे. त्यासाठी लवकर निवडणूक घेणे गरजेचे आहे’, अशी आबे यांची भूमिका होती. त्यामुळेच संसदेचा कालावधी पुढील वर्षी संपत असूनही आबे यांनी जपानमध्ये मध्यावधी निवडणूक घेतली.

50 हजारांच्या बँक व्यवहारांसाठी ओळखपत्र अनिवार्य :

  • कोणत्याही बँकेतील किंवा वित्तीय संस्थेतील 50 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारासाठी आता ओळखपत्राची मूळ प्रत अनिवार्य असणार आहे.
  • आर्थिक घोटाळे, बोगस नोटा यांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने याबद्दलची अधिसूचना जारी केली असून त्यासाठी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत.
  • नव्या नियमांमुळे बँक किंवा आर्थिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांना ग्राहकांचे ओळखपत्र तपासून त्याची नोंद ठेवणे आवश्यक असेल. याशिवाय मोठ्या व्यवहाराची माहिती फायनान्शियल इंटलिजन्स युनिटला देणे बंधनकारक राहिल. यासोबतच ग्राहकांना व्यवहार करताना त्यांचा आधार क्रमांकही बँकांना द्यावा लागेल. आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी आणि काळा पैशाच्या निर्मितीला पायबंद घालण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडून याबद्दलची अधिसूचना काढण्यात आली आहे.
  • सहकारी बँका, आर्थिक संस्था, पतसंस्था, चिट फंड कंपन्या, शेअर ब्रोकर आणि बिगर वित्तीय कंपन्यांना हा नियम लागू होणार आहे.
  • कोणत्याही बँकेत खाते उघडण्यासाठी आधार कार्ड आणि इतर ओळखपत्रांची आवश्यकता असते. मात्र आता 50 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांसाठीही ओळखपत्राची मूळ प्रत आवश्यक असेल. त्यामुळे ग्राहकांना असे व्यवहार करताना ओळखपत्राची झेरॉक्स प्रत वापरता येणार नाही.

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज बांगलादेश दौऱ्यावर :

  • भारत आणि बांगलादेशदरम्यान व्दिपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या सल्लागार समितीच्या दोन दिवसीय बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ढाका दौऱ्यावर गेल्या आहेत. यावेळी बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री एएच अहमद अली यांनी स्वराज यांचे बांगाबंधू विमानतळावर स्वागत केले.
  • यावेळी दोघांमध्ये तिस्ता नदी आणि रोहिंग्या प्रकरणावर चर्चा झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दौऱ्यामध्ये स्वराज या बांगलादेशमधील विचारवंत, प्रतिनिधींशी विविध विषयांवर चर्चा करणार आहेत.
  • याचबरोबर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचीही भेट घेतल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
  • बांगलादेशमधील खुलना शहरामध्ये बहुद्देशीय सुविधा केंद्र सुरू करण्याबाबत व्दिपक्षीय करार आणि हाय-स्पीड डिझेल पुरवठय़ाबाबतच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात येणार आहेत. यानंतर भारताकडून अर्थसाहाय्य असलेल्या 15 विकास प्रकल्पांचे उद्घाटनही करण्यात येणार आहे.
  • भारत बांगलादेशमधील रस्ते, रेल्वे, वीज आदी प्रकल्पांमध्ये जवळपास 4.5 अब्ज डॉलर्सची मदत करणार आहे.

    चीनने बांगलादेशला आपल्या बाजूने वळवण्यासाठी मदत केल्याच्या पाश्र्वभूमीवर भारताने हे पाऊल उचलले आहे. 

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.