Current Affairs of 22 September 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (22 सप्टेंबर 2017)

चालू घडामोडी (22 सप्टेंबर 2017)

एकदिवसीय सामन्यात कुलदीप यादवची हॅटट्रिक :

  • चायनामन गोलंदाज म्हणून आपले अस्तित्व निर्माण करत असलेल्या कुलदीप यादवने ऐतिहासिक ईडन गार्डनवर हॅटट्रिक करण्याचा पराक्रम केला. त्याच्या या कामगिरीमुळे भारताने घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी पाच सामन्यांच्या मालिकेतील विजयाची दुसरी माळ गुंफली. हा दुसरा सामना 50 धावांनी जिंकून भारताने 2-0 आघाडी घेतली.
  • प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या 92 धावांनंतरही अडीचशे धावा करताना दमछाक झालेल्या भारताने ऑस्ट्रेलियाला 202 धावांत गुंडाळले.
  • कुलदीप यादव एकदिवसीय सामन्यात हॅटट्रिक करणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. या अगोदर चेतन शर्मा आणि कपिलदेव यांनी ही कामगिरी केली आहे.
  • तसेच कुलदीपने स्वतःच्या नवव्या आणि डावातील 33 व्या षटकात हा पराक्रम केला. त्याने मॅथ्यू वेड, ऍस्टन ऍगर आणि कमिन्स यांना सलग तीन चेंडूंवर बाद केले.

यस बँकेकडून 2500 कर्मचाऱ्यांची कपात :

  • सरकारी क्षेत्रापासून खासगी आणि बँकिंग क्षेत्र अशा सर्वच ठिकाणी कर्मचारी कपात सुरु असताना यस बँकेनेही आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
  • यस बँकेतील 2500 कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे. ही संख्या खूप मोठी असून बँकेच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 10 टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे.
  • कर्मचाऱ्यांची खराब कामगिरी, डिजिटायझेशन आणि लोकांची तितकी आवश्यकता नसल्याने ही कपात करण्यात आल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे.
  • सध्या यस बँकेत 21 हजार कर्मचारी काम करतात. त्यातील 2500 कर्माचाऱ्यांची आता कपात करण्यात येणार आहे.
  • तसेच याआधी एचडीएफसी बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर कपात केली होती. त्यानंतरची बँक कर्मचाऱ्यांची ही दुसरी मोठी कपात आहे.
  • एचडीएफसी बँकेने मार्च 2017 पर्यंत तीन टप्प्यांमध्ये आपल्या 11 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी केले होते.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा खासदारकीचा राजीनामा :

  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
  • आदित्यनाथ गोरखपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते, तर मौर्य फुलपूर (अलाहाबाद) मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.
  • उत्तर प्रदेशमध्ये सत्तापालटानंतर पक्षनेतृत्वाने योगी आदित्यनाथ यांच्यावर विश्‍वास दाखवत त्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविली, तसेच केशवप्रसाद मौर्य यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद सोपविण्यात आले होते.
  • तसेच त्यानंतर गेल्या आठवड्यात दोन्ही नेत्यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

शिर्डी विमानतळाचा प्रारंभ 1 ऑक्टोबरपासून :

  • जगभरातील भक्तांच्या श्रद्धेचे स्थान असलेले श्रीसाईबाबांचे शिर्डी अखेर हवाई नकाशावर आले असून नागरी हवाई महासंचालनालयाने (डीजीसीए) शिर्डी विमानतळाला उड्डाण परवाना जारी केला. श्रीसाईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षांचा प्रारंभ या विमानतळाच्या उद्घाटनाने होत असून ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 1 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे.
  • राहता तालुक्यातील काकडी गावामध्ये असलेल्या विमानतळाचा रनवे अडीच हजार मीटरपेक्षा जास्त असून तो ए-320 आणि बोइंग 737 जातींच्या विमानांसाठी पुरेसा असेल, अशी माहिती डीजीसीएच्या अधिकाऱ्याने दिली.
  • राष्ट्रपतींचा दौरा जवळपास निश्चित झाल्याने डीजीसीएने उड्डाण परवाना देण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण केल्याचे समजते. या विमानतळावर 2750 चौरस मीटरची टर्मिनल इमारत असून चार विमानांना पुरेल एवढय़ा हँगरची सुविधा आहे.
  • अगोदरच घोषित केल्याप्रमाणे श्रीसाईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे त्याचे नाव आहे. प्रारंभीच्या टप्प्यात मुंबई, दिल्ली आणि हैदराबादला शिर्डी जोडले जाईल.
  • मुंबई आणि दिल्लीमधून अलायन्स एअरलाइन्स, तर हैदराबादहून ट्रजेटची सेवा असेल. नंतर तिचा विस्तार यथावकाश केला जाईल.

ज्येष्ठ अभिनेत्री शकिला यांचे निधन :

  • ‘बाबूजी धीरे चलना’सारख्या गाण्याला पडद्यावर अजरामर करणा-या ज्येष्ठ अभिनेत्री शकिला (वय 82 वर्ष) यांचे 20 सप्टेंबर रोजी मुंबईत निधन झाले.
  • पन्नाससाठच्या दशकात निरागस चेहर्‍यांची अभिनेत्री अशी त्यांची ओळख होती. गुरुदत्त यांच्या ‘आर-पार’, ‘सीआयडी’ या गाजलेल्या सिनेमांत त्यांनी काम केले होते.
  • शम्मी कपूर यांच्यासोबत त्यांनी ‘चायना टाऊन’ चित्रपटात काम केले होते. आपल्या चौदा वर्षांच्या कारकिर्दीत शकिला यांनी जवळपास 50 चित्रपटांमध्ये काम केले.
  • तसेच लग्नानंतर त्या इंग्लडमध्ये स्थायिक झाल्या होत्या. त्यांना मिनाज नावाची मुलगी होती. मात्र, 1991 साली मुलीचे निधन झाल्यानंतर त्या भारतात परतल्या होत्या.

दिनविशेष :

  • रयत शिक्षणसंस्थेचे संस्थापक ‘कर्मवीर भाऊराव पाटील’ यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 मध्ये झाला.
  • 22 सप्टेंबर 1923 हा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती ‘रामकृष्ण बजाज’ यांचा जन्मदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.