Current Affairs of 14 December 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (14 डिसेंबर 2015)

चालू घडामोडी (14 डिसेंबर 2015)

सर्व देशांना बंधनकारक करणारा पर्यावरण करार मंजूर :

  • कार्बनसह हरितवायूंचे उत्सर्जन कमी करून तापमानवाढ नियंत्रणात आणणे जगातील जवळपास सर्व देशांना बंधनकारक करणारा पर्यावरण करार मंजूर करण्यात आला.
  • तसेच या कराराचा अंतिम मसुदा सादर करण्यात आला होता.या करारानुसार, जागतिक तापमानवाढ 1.5 अंशाच्या वर जाऊ न देण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे.
  • गेली अनेक वर्षे या कराराबाबत चर्चा होत होती. मात्र जागतिक तापमानवाढीचे संकट वाढल्याने यंदा बहुतेक वाद मिटवून सर्व देशांनी या करारासाठी जोर लावला होता.
  • हरितवायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी गरीब आणि विकसनशील देशांना 2020 पर्यंत शंभर अब्ज डॉलरचा निधी उपलब्ध करून देण्याचेही करारात निश्‍चित करण्यात आले आहे. 2050 पर्यंत हरितवायूंचे उत्सर्जन बंद करण्यावर आता सर्व देशांचा भर असणार आहे.
  • जैविक इंधनाचे युग समाप्त करून अपारंपरिक ऊर्जेकडे वाटचाल करण्यासाठी जगातील 195 देशांनी मिळून केलेला हा पहिलाच पर्यावरण करार आहे.
  • श्रीमंत देशांनी द्यावयाच्या भरपाईबद्दल अद्याप निश्‍चित धोरण ठरले नसले, तरी या करारातील मुद्यांबाबत बहुतांश देश समाधानी आहेत.
  • हरितवायूंचे उत्सर्जन कमी करण्याबाबत आधी झालेला केटो करार अमेरिकेसह काही देशांनी नाकारला होता. पॅरिस परिषदेत झालेला हा करार सर्वच देशांना बंधनकारक आहे. दर पाच वर्षांनी प्रत्येक देशाला ठरवून दिलेल्या उद्दिष्टांचा आढावा घेतला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांना येण्या-जाण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या बस भेट देणार :

  • राजधानी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यात खासदारांचाही सहभाग असावा, या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांना येण्या-जाण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या दोन बस भेट देणार आहेत. केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.
  • उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) तयार केलेल्या बॅटरीसारख्याच लिथियमच्या बॅटरीचा या बसमध्ये वापर करण्यात आला आहे.
  • तसेच इस्रोने केंद्र सरकारला सहकार्य करत पाच लाख रुपयांना ही बॅटरी तयार केली आहे. उपग्रह प्रक्षेपणासाठी वापरण्यात येणाऱ्या बॅटरीची किंमत 55 लाख रुपये असते.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मेक इन इंडिया” मोहिमेंतर्गत या प्रकारच्या बसला प्रोत्साहन दिले जाणार असून, लवकरच याचे पेटंट घेतले जाणार असल्याची माहितीही दिली.
  • प्रायोगिक तत्त्वावर दिल्लीमध्ये लवकरच अशा पंधरा बस उतरविल्या जातील. हा प्रयोग यशस्वी झाल्यास इतर शहरांमध्येही त्यांचा वापर सुरू केला जाईल.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित :

  • ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आशिष शेलार उपस्थित होते.
  • एप्रिल महिन्यात दिल्लीत झालेल्या पुरस्कार सोहळ्याला प्रकृती अस्वस्थ्यामुळे दिलीप कुमार यांना उपस्थित राहता आले नव्हते.

डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद भूषविण्याची शक्यता :

  • ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पुढच्या वर्षी 12 जानेवारीपासून भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेत दुखापतग्रस्त स्टिव्हन स्मिथच्या स्थानी ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद भूषविण्याची शक्यता आहे.
  • भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद वॉर्नर सांभाळण्याची शक्यता आहे.
  • तसेच बिग बॅश लीगच्या सुरुवातीच्या फेरीतील लढतींमध्येही स्मिथ खेळणार नाही.

भारत आणि अमेरिका यांच्यातील अणुसहकार्य कराराची अंमलबजावणी नवीन वर्षात :

  • भारत आणि अमेरिका यांच्यातील अणुसहकार्य कराराची अंमलबजावणी नवीन वर्षात होऊ शकते. अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
  • भारत आणि अमेरिका यांच्यातील अणुसहकार्य कराराबाबत अनेक बाबी पूर्ण झाल्या आहेत, तर काही पूर्णत्वास जात आहेत.
  • भारत आणि अमेरिका संपर्क समूहाची मागील बैठक नोव्हेंबर महिन्यात वॉशिंग्टनमध्ये झाली होती.

परिभ्रणाचा वेग मंदावल्याचा परिणाम :

  • पृथ्वीच्या ध्रुवांवर असलेल्या हिमनद्या वितळत असून त्यामुळे सागरी जलपातळी वाढत आहे. परिणामी पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग मंदावला असून त्यामुळे दिनमानाचा कालावधी वाढत आहे, तो 1.7 मिलिसेकंदांनी वाढला असला तरी त्याचा संकलित परिणाम विचारात घेतला तर तो जास्त असू शकेल, असे नवीन संशोधनात दिसून आले आहे.
  • सागरी जलपातळीत भूतकाळात झालेले फरक अभ्यासून आगामी काळाबाबत हवामान बदलांचे भाकित करण्यासाठी संशोधन करण्यात आले असून त्यात पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग कमी होत चालल्याचे निदर्शनास आले आहे.
  • कॅनडातील अल्बर्टा विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक मॅथ्यू डमबेरी यांनी सांगितले की, गेल्या शतकातील सागरी पातळीतील बदलांचा अभ्यास करताना पृथ्वीच्या गाभ्याच्या गतिशीलतेचाही विचार करण्यात आला.
  • हिमनद्या वितळल्याने सागरी जलपातळी वाढते व त्यामुळे पृथ्वीचे वस्तुमान ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे सरकते त्यामुळे परिभ्रमणाचा वेग कमी होतो.
  • चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावानेही पृथ्वीचा वेग मंदावतो. असे असले तरी केवळ या दोन कारणांमुळेच पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग मंदावतो असे नाही तर पृथ्वीच्या गाभ्यातील गतिशील परिणामांचा त्यात समावेश असावा.
  • गेल्या तीन हजार वर्षांत पृथ्वीचा गाभा थोडा वेग घेतो आहे, तर वरच्या कवचाचा वेग मंदावतो आहे. त्याचा परिणाम म्हणून पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग अधिक मंदावतो. त्यामुळे दिनमान 1.7 मिलिसेकंदांनी वाढले आहे.
  • हे प्रमाण फार मोठे नाही, पण दूरगामी विचार केला तर त्याचा परिणाम जास्त आहे.
  • वैज्ञानिकांच्या मते 21 व्या शतकाच्या अखेरीस सागरीपातळी काय असेल याचा अंदाज करता येऊ शकतो. हवामान बदलाशी सामना करताना आपण अब्जावधी डॉलर्सच्या पायाभूत गुंतवणुकीचा विचार करीत असून किनारी भागतील शहरांसाठी ती गुंतवणूक अधिक असली पाहिजे.

दिनविशेष :

  • राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन
  • 1991 : नॉर्वेजियन ध्रुव-प्रवासी रोआल्ड अमुंडसेन दक्षिण ध्रुवावर पोहोचलेला पहिला मानव ठरला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.