Current Affairs of 25 November 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (25 नोव्हेंबर 2015)

2016 मध्ये जीएसटी विधेयक मंजूर केले जाण्याचा विश्‍वास :

  • मलेशियापाठोपाठ सिंगापूरमध्येही जागतिक गुंतवणूकदारांना भारतात येण्याचे आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परकी गुंतवणूकदारांना सोयीचे जावे, यासाठी अधिक सुधारणा करण्याचे आश्‍वासन दिले.
  • गुंतवणूकदारांची योग्य काळजी घेतानाच 2016 मध्ये वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विधेयक मंजूर केले जाण्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
  • पुढील वर्षापासून देशात वस्तू आणि सेवाकराची अंमलबजावणी सुरू होऊन नवे वातावरण तयार होईल, अशी आशा व्यक्त करत मोदी यांनी कंपनी कायदे लवाद स्थापन करणार असल्याचे जाहीर केले.
  • तसेच कर आणि नियंत्रणाबाबत असलेल्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी 14 ठोस उपाय केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
  • संरक्षण सहकार्य वाढविण्याबरोबरच सायबर सुरक्षा, जहाज बांधणी आणि नागरी उड्डाण या क्षेत्रांमध्ये हे दहा करार करण्यात आले.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात संरक्षणासह विविध क्षेत्रांशी संबंधित दहा करार :

  1. भारत आणि सिंगापूरमधील संबंध धोरणात्मक भागीदारी पातळीवर नेणे
  2. संरक्षण मंत्री पातळीवर चर्चा सुरू करणे, दोन्ही देशांमध्ये संयुक्त लष्करी सराव, संयुक्त उत्पादन आणि विकासासाठी दोन्ही देशांच्या संरक्षण कंपन्यांमध्ये सहकार्य वाढविणे
  3. सुरक्षा सहकार्यासाठी भारतीय माहिती तंत्रज्ञान विभाग, भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद गट (सर्ट-इन) आणि सिंगापूर सायबर संस्थेदरम्यान करार
  4. भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि सिंगापूर कॉर्पोरेशन एंटरप्राइजेस यांच्यात नागरी उड्डाण सेवेबाबत आणि जयपूर आणि अहमदाबाद विमानतळ व्यवस्थापनाबाबत करार
  5. नीती आयोग आणि सिंगापूर कॉर्पोरेशन एंटरप्राइजेसमध्ये योजना सहकार्य करार
  6. भारताचा अंमलीपदार्थ नियंत्रण विभाग आणि सिंगापूरचा केंद्रीय अंमलपदार्थ विभाग यांच्यामध्ये अंमलीपदार्थाच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्यासाठी सामंजस्य करार
  7. भारताच्या गाव आणि देश नियोजन संस्था आणि सिंगापूर कॉर्पोरेशन एंटरप्राइजेस यांच्यामध्ये नगर नियोजन आणि प्रशासन सहकार्य करार
  8. जहाज बांधणी करार
  9. सिंगापूरमधील आशियाई संस्कृती संग्रहालयाला कर्जपुरवठा
  10. दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध आणि नागरिकांमध्ये थेट संवाद वाढविण्यासाठी प्रयत्न करणे  

“स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना” :

  • यंदाच्या वर्षापासून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी “स्व. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना” राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
  • या योजनेनुसार विमा कंपन्यांना हप्त्याची रक्कम दिल्यापासून 12 महिने कालावधीसाठी शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे विमासंरक्षण मिळणार आहे.
  • या योजनेसाठी आवश्‍यक असणारा निधी वितरित करण्यासही या वेळी मान्यता देण्यात आली.
  • या योजनेचा लाभ सात-बारावरील नोंदीप्रमाणे 10 ते 75 वर्षे वयोगटातील राज्यातील 1 कोटी 37 लाख शेतकऱ्यांना होणार आहे.
  • तसेच राज्यात सध्या राबविण्यात येत असलेल्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेची मुदत 30 नोव्हेंबर 2015 रोजी समाप्त होत असल्याने ही नवी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • योजनेसाठी दोन लाख रुपयांच्या विमासंरक्षणासाठी 27 कोटी 24 लाख 93 हजार रुपयांचा विमा हप्ता भरण्यात येणार आहे तसेच शेतकऱ्यांना विहित कागदपत्रांशिवाय इतर कोणतीही कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत.
  • योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने विमा कंपन्यांकडे स्वतंत्ररीत्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही.
  • सर्व खातेदार शेतकऱ्यांचा हप्ता राज्य शासनाद्वारे भरण्यात येणार आहे; तसेच यापूर्वी शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने कोणतीही वेगळी विमा योजना लागू केली असल्यास अथवा विमा उतरविला असल्यास त्याचा या योजनेशी काहीही संबंध असणार नाही. या योजनेचे लाभ स्वतंत्ररीत्या मिळणार आहेत.
  • तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी स्वच्छ महाराष्ट्र कोष स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली.
  • स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण आणि नागरी भागांत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी हा कोष वापरण्यात येणार आहे.
  • मुख्यमंत्री या कोषाचे अध्यक्ष; तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, नगरविकास राज्यमंत्री, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव (वित्त), प्रधान सचिव (नगर विकास-1), प्रधान सचिव (पाणीपुरवठा व स्वच्छता), सचिव (नगर विकास-2) सदस्य असतील.
  • तर नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमी या पोलिस प्रशिक्षण संस्थेस पुण्याच्या “यशदा” या संस्थेच्या धर्तीवर स्वायत्तता देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला.
  • यामुळे ही संस्था यापुढे महाराष्ट्र पोलिस दलाची शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून कार्य करणार आहे.

गदिमा पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना जाहीर :

  • साहित्य, चित्रपट आणि कलाक्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना जाहीर झाला आहे.
  • गीतरामायणकार गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात गदिमांच्या 38 व्या स्मृतीदिनानिमित्त 14 डिसेंबर रोजी ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते होणार आहे.
  • गदिमांच्या पत्नी विद्या माडगूळकर यांच्या स्मरणार्थ गेल्या दहा वर्षांपासून गदिमा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘गृहिणी सखी सचिव’ पुरस्कार आंतरराष्ट्रीय किर्तीचे अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या पत्नी वसुंधरा जाधव यांना देण्यात येणार आहे.
  • गेल्या तीन वर्षांपासून दिला जाणारा ‘विद्या प्रज्ञा पुरस्कार’ भारतातील युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांना जाहीर झाला आहे.
  • तर नव्या उभारीच्या प्रतिभावंतांना स्फूर्तीदायक ठरलेला चैैत्रबन पुरस्कार कथा, पटकथा, गीतकार आणि दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांना जाहीर झाला आहे.

वस्तू विक्रीसाठी हिंदू देवदेवताच्या नावांचा वापर करता येणार नाही :

  • वस्तू आणि सेवा विक्रीसाठी हिंदू देवदेवता अथवा धार्मिक ग्रंथांच्या नावांचा वापर करता येणार नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
  • अशा प्रकारच्या गोष्टींना मान्यता दिल्यास जनतेच्या संवेदनक्षमतेवरील विश्वासाला तडा जाऊ शकतो, असे न्या. रंजन गोगोई आणि न्या. एन. व्ही. रामन यांच्या पीठाने म्हटले आहे.
  • पाटणा येथील लालबाबू प्रियदर्शी यांनी उदबत्त्या आणि सुंगधी द्रव्ये यांच्या विक्रीसाठी ‘रामायण’ हा ट्रेडमार्क वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका केली होती, त्या वेळी पीठाने वरील बाब स्पष्ट केली.
  • कोणत्याही व्यक्तीला नफा मिळविण्यासाठी देवदेवता अथवा धार्मिक ग्रंथांच्या नावाचा वापर करण्याचा अधिकार देता येणार नाही, हा युक्तिवाद पीठाने मंजूर केला.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.