5 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

एन. एम. प्रताप
एन. एम. प्रताप

5 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 फेब्रुवरी 2020)

ई-कचऱ्यापासून 22 वर्षीय भारतीय तरुणाने बनवले 600 ड्रोन :

  • कर्नाटकमधील एन. एम. प्रताप या मुलाने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी ‘ड्रोन वैज्ञानिक’ अशी ओळख मिळवली आहे.
    प्रतापने ई कचऱ्यापासून एक दोन नव्हे चक्क 600 ड्रोन आतापर्यंत तयार केली आहेत. ड्रोनच्या मदतीने सामान्यांचे प्राण वाचवण्याच्या उद्देशाने प्रताप हे काम करत असल्याचे सांगतो. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संकटात सापडलेल्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी हे ड्रोन वापरता यावेत असं प्रतापला वाटतं.
  • तर प्रतापने आतापर्यंत अनेकदा ड्रोनच्या सहाय्याने आपत्कालीन परिस्थीतीमध्ये नागरिकांना मदत करणे, वाहतूककोंडीवर लक्ष ठेवणे, सीमासुरक्षेसंदर्भातील काम केलं आहे. सध्या तो ड्रोन हॅक होऊ नये यासंदर्भातील क्रिप्टोग्राफीचे काम करत आहे.
  • तसेच कर्नाटकमध्ये 2019 साली आलेल्या पुरामध्ये हजारो लोक अडकून पडले होते. त्यावेळी दूर्गम ठिकाणी अडकलेल्या लोकांना प्रतापच्या सहकार्याने ड्रोनच्या माध्यमातून अन्न आणि औषधे पोहचवण्यात आली होती.
  • प्रताप तुटलेल्या, मोडलेल्या ड्रोनमधील भाग वापरुन नवीन ड्रोन तयार करतो. तुटलेल्या ड्रोनमधील मोटर्स, कॅपेसिटर्स आणि इतर इलेक्ट्रीक वस्तू प्रताप फेकून न देता पुन्हा वापरतो. यामुळे प्रतापला स्वस्तात ड्रोन बनवता येतात. तसेच ई-कचरा कमी होत असल्याने पर्यावरणाचेही संवर्धन होते.
  • तर आतापर्यंत प्रतापला 87 देशांमधून आमंत्रित करण्यात आलं आहे. 2017 साली जपानमधील टोकियो येथे झालेल्या टोकियो आंतरराष्ट्रीय रोबोटीक प्रदर्शनामध्ये त्याने सुवर्ण आणि रौप्य पदक आणि 10 हजार डॉलरचे बक्षिस जिंकले होते.
  • 2018 साली जर्मनीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ड्रोन एक्स्पोमध्ये प्रतापला अलबर्ट आइन्स्टाइन इनोव्हेशन गोल्ड मेडल मिळालं होतं.

राष्ट्रीय अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धात मीराबाई चानूचा राष्ट्रीय विक्रम :

  • ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा असलेली आणि माजी जगज्जेती मीराबाई चानू हिने मंगळवारी राष्ट्रीय वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली.
  • तर तिने 49 किलो वजनी गटात आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत 203 किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले.
  • मणिपूरच्या 25 वर्षीय मीराबाईने स्नॅच प्रकारात 88 तर क्लिन आणि जर्क प्रकारात 115 किलो वजन उचलत एकूण 203 किलो वजनाचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी तिने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात थायलंड येथील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 201 किलो वजनाचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता.
  • तसेच रेल्वेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मीराबाईची सहकारी संजिता चानू हिने 185 किलो वजन उचलत रौप्यपदक पटकावले तर तेलंगणाच्या टी. प्रियदर्शिनी हिने 168 किलो वजनासह कांस्यपदक प्राप्त केले.
  • मीराबाईने मंगळवारी साकारलेल्या या कामगिरीमुळे तिने जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी मजल मारली. ती चीनची जियांग हुईहुआ आणि होऊ झिहुई आणि कोरियाची री संग गम यांच्यानंतर चौथ्या स्थानी आहे.

भारताच्या खात्यात अनोख्या विक्रमाची नोंद :

  • मुंबईकर यशस्वी जैस्वालच्या नाबाद शतकी खेळाच्या जोरावर भारताने 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मात केली. पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं 173 धावांचं लक्ष्य भारताने एकही गडी न गमावता पूर्ण केलं.
  • या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर भारताने 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत आपल्या नावावर अनोखा विक्रम जमा केला आहे.
  • तर 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात एखाद्या संघाने उपांत्य फेरीचा सामना एकही गडी न गमावता जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
  • यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरला. पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेत यशस्वीने नाबाद 105 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 8 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.
  • 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात उपांत्य किंवा अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांनी शतक झळकावण्याची ही पाचवी वेळ ठरली.

88 वर्षांनंतर पुन्हा टाटा समुहाच्या मालकीत येणार एअर इंडिया :

  • ज्या एअरलाईन्सचा जेआरडी टाटांनी 88 वर्षांपूर्वी पाया घातला होता, ती पुन्हा टाटा होणार असल्याचं दिसून येत आहे.
  • तर अडचणीत आलेल्या एअर इंडियासाठी 17 मार्चपर्यंत निविदा मागविण्यात आल्या आहेत आणि टाटा समूह या नॅशनल कैरियरसाठी आपली दावेदारी अंतिम करण्याच्या स्थितीत आहे.
  • तसेच 1932 मध्ये जेआरडी टाटाने एअर इंडियाचा पाया रचला होता आणि 1946 मध्ये त्याचे राष्ट्रीयकरण झाले.
  • सुरुवातीला ते टाटा एअरलाइन्स म्हणून ओळखले जात होते, राष्ट्रीयकरणानंतर 1948 मध्ये त्याला एअर इंडिया असं नाव देण्यात आले. आता ही विमान कंपनी पुन्हा एकदा टाटाच्या समुहात परतू शकते. टाटा ग्रुप एअर इंडिया विकत घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये एअर एशिया इंडियाचे विलीनीकरण आणि एअर इंडियाची 100% उपकंपनी एअर इंडिया एक्सप्रेसचा समावेश आहे.
  • टाटा समूहाने एअर एशियामध्ये 49% भागधारक असलेल्या मलेशियन उद्योजक टोनी फर्नांडिस यांच्याकडेही संपर्क करुन एअर इंडिया एक्स्प्रेस खरेदी करण्यासाठी परवानगी मागितली आहे. भागधारक करारानुसार फर्नांडिस तयार नसल्यास टाटा समूह अन्य कोणत्याही एअरलाईन्समध्ये 10% पेक्षा जास्त गुंतवणूक करू शकत नाही.

सफाई कर्मचाऱ्याचा कामावर मृत्यू झाल्यास 1 कोटींची नुकसान भरपाई :

  • सफाई कर्मचाऱ्याचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा आम आदमी पार्टीने (आप) केली आहे.
  • दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी आपने आज (मंगळवार) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये त्यांनी हे आश्वासन दिले.
  • दिल्लीत जाहीरनामा प्रसिद्ध करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि पक्षाचे इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी सिसोदिया यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला. ते म्हणाले, “जर सफाई कर्मचाऱ्याचा कामावर असताना मृत्यू झाला तर
  • त्याच्या किंवा तिच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.” त्याचबरोबर मुंबईतील नाईट लाईफच्या धर्तीवर दिल्लीतील विविध महत्वाच्या व्यावसायिक ठिकाणी चोवीस तास खुले असणारे प्रायोगिक तत्वावर मार्केट तयार करण्याची घोषणाही यावेळी आपच्या नेत्यांकडून करण्यात आली. या मार्केटमध्ये दुकानं, रेस्तराँ आदींचा समावेश असणार आहे. जी आठवड्यातील सातही दिवस चोवीस तास खुली असतील.

दिनविशेष:

  • चार्ली चॅप्लिनने सन 1919 मध्ये इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली होती.
  • सन 1952 मध्ये स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या.
  • सन 2003 या वर्षी भारताने 2002 मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-4 या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.
  • पुण्याची स्वाती घाटे ही सन 2004 या वर्षी बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.