21 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

21 January 2020 Current Affairs In Marathi
21 January 2020 Current Affairs In Marathi

21 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (21 जानेवारी 2020)

तीन राजधानी असलेलं आंध्र प्रदेश देशातील एकमेव राज्य :

  • आंध्र प्रदेशच्या तीन राजधान्यांचे विधेयक सोमवारी विधानसभेत मंजुर करण्यात आले. यापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या विधेयकाला मंजुरी देण्यात आली होती.
  • तसेच त्यानंतर हे विधेयक विधानसभेत सादर करण्यात आलं होतं. आवाजी मतदानानं हे विधेयक सोमवारी मंजुर करण्यात आलं. या विधेयकानुसार विशाखापट्टणम ही कार्यकारी राजधानी, अमरावती विधीमंडळ तर कुरनूल ही आंध्र प्रदेशची न्यायिक राजधानी असेल.
  • तर या विधेयकाला विरोधकांकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. तसंच चर्चेदरम्यान गोंधळ घालणाऱ्या आमदारांवर कारवाई करत अध्यक्षांनी त्यांना दिवसभरासाठी निलंबितदेखील केलं होतं.

एक जूनपासून ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेला सुरूवात :

  • ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजना 1 जून पासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दिली. या योजनेअंतर्गत ग्राहक एका रेशन कार्डाचा वापर देशभरात कोणत्याही ठिकाणी करू शकणार आहे.
  • तर यापूर्वी ‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेचा पायलट प्रोजेक्ट चार राज्यांमध्ये लागू करण्यात आला होता.
  • महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि गुजरात या राज्यांमध्ये रेशन कार्डाच्या पोर्टेबिलिटीची सुविधा देण्यात आली होती.

आता भारत पाण्याखालूनही करु शकतो अण्वस्त्र हल्ला :

  • भारताने अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ रविवारी ही चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 3,500 किलोमीटर आहे.
  • तर समुद्रात पाण्याखालून K-4 क्षेपणास्त्र डागण्यात आले. पाणबुडीमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येऊ शकते. अरिहंत वर्गाच्या अण्वस्त्र पाणबुडयांवर या क्षेपणास्त्राची तैनाती करण्यात येईल.
  • तसेच अरिहंत ही स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) K-4 क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
  • भारत आपल्या पाणबुडयांच्या ताफ्यासाठी पाण्याखालून हल्ला करु शकणारी दोन क्षेपणास्त्रे विकसित करत आहे. K-4 त्यापैकी एक आहे. K-4 ची मारक क्षमता 3,500 किलोमीटर आहे तर दुसऱ्या क्षेपणास्त्राची रेंज 700 किलोमीटर आहे.
  • तीन मीटर लांब क्षेपणास्त्र एक टनापर्यंत अण्वस्त्र वाहून नेऊ शकते.
  • पाणबुडीमधून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता खूप महत्वपूर्ण आहे. यामुळे भारत आता हवा, जमीन आणि पाण्याखालूनही अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम झाला आहे.
  • आतापर्यंत फक्त अमेरिका, रशिया आणि चीनकडे पाणबुडीमधून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता होती. भारताचा आता या देशांच्या पंक्तीत समावेश झाला आहे.
  • अण्वस्त्र पाणबुडयांवर K-4 क्षेपणास्त्राची तैनाती करण्याआधी डीआरडीओकडून या क्षेपणास्त्राच्या आणखी चाचण्या करण्यात येतील. सध्या भारतीय नौदलाची आयएनएस अरिहंत ही अण्वस्त्र पाणबुडी कार्यरत आहे.

हिंदी महासागरात चीनवर वचक ठेवणार भारताचा ‘टायगर’:

  • बंगालची खाडी आणि हिंदी महासागर क्षेत्राचा भाग भारतासाठी रणनितीक दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा आहे.
  • अलीकडच्या काळात या भागात चिनी नौदलाच्या हालचाली मोठया प्रमाणात वाढल्या आहेत.
  • चीनच्या या वाढत्या आव्हानाचा सामना करण्यासाठी भारताकडे आता घातक शस्त्रास्त्रे उपलब्ध आहेत. शत्रूच्या विमानवाहू युद्ध नौकांना दूर अंतरावरुन तसेच महत्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याची क्षमता भारताला प्राप्त झाली आहे.
  • तर रात्रीच्यावेळी किंवा कुठल्याही वातावरणात शत्रूवर अत्यंत अचूकतेने प्रहार करता येईल. तामिळनाडूतील तंजावर एअर बेसवर इंडियन एअर फोर्स सुपसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेली सुखोई-30 एमकेआयची स्क्वाड्रन तैनात करणार आहे.
  • तसेच सुखोई-30 हे खास नौदलासाठी विकसित केलेले विमान नाही. पण या फायटर जेटवर समुद्रातील टार्गेटसना लक्ष्य करण्याची जबाबदारी असेल.
  • ब्रह्मोसमुळे सुखोईची हल्ला करण्याची क्षमत कैकपटीने वाढली आहे असे एअर फोर्स प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी सांगितले. सुखोई आणि ब्रह्मोस एकत्र आल्यामुळे एअर फोर्सला दूर अंतरावरुनच समुद्र किंवा जमिनीवरील कुठल्याही लक्ष्यावर अचूक प्रहार करण्याची क्षमता प्राप्त करुन देण्याचे आमचे स्वप्न पूर्ण झाले आहे असे ब्रह्मोस प्रकल्पाचे महासंचालक सुधीर मिश्रा म्हणाले.

उत्तराखंडमध्ये आता उर्दूऐवजी संस्कृतमध्ये लिहिली जाणार रेल्वे स्थानकांची नावं :

  • उत्तराखंडमध्ये रेल्वे स्थानकांवर लावण्यात आलेल्या स्थानकाच्या नावांच्या फलकामधील उर्दू भाषेतील नावाचा उल्लेख आता संस्कृत भाषेत केला जाणार आहे.
  • रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. हा बदल करण्यामागचे कारण सांगताना उत्तर रेल्वेने सांगितले की, संस्कृत ही राज्याची दुसरी अधिकृत भाषा असल्याने हा बदल करण्यात आला असून तो नियमानुसारच आहे.
  • तर सन 2010 मध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी संस्कृत ही राज्याची दुसरी अधिकृत भाषा असल्याची घोषणा केली होती. हे निशंक आता केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री आहेत.
  • उत्तर रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांच्या माहितीनुसार, रेल्वेच्या नियमावलीत हे सांगण्यात आले आहे की, प्लॅटफॉर्मवरील साईन बोर्डवर रेल्वे स्थानकांची नावं हिंदी आणि इंग्रजीनंतर संबंधीत राज्याच्या दुसऱ्या अधिकृत भाषेत लिहिली जायला हवीत.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धात महाराष्ट्राचे पदकांचे द्विशतक :

  • महाराष्ट्राने पदकांचे द्विशतक ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेत करत सोनेरी कामगिरी कायम ठेवली.
  • राज्याची आता 63 सुवर्ण, 62 रौप्य आणि 79 कांस्यपदकांसह एकूण 204 पदके झाली आहेत.
  • तसेच सोमवारी महाराष्ट्राने जलतरणातील सोनेरी कामगिरी कायम राखतानाच बॉक्सिंगमध्येही राज्याच्या नऊ खेळाडूंनी अंतिम फेरी गाठली.
  • टेनिसमध्येही ध्रुव आणि आकांक्षा नित्तुरे यांनी अंतिम फेरी गाठली. सोमवारी एका दिवसात तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशी सहा पदके राज्याच्या जलतरणपटूंनी मिळवली.

विराटने मोडला धोनीचा ‘हा’ विक्रम :

  • भारताच्या ‘हिटमॅन’चं धडाकेबाज शतक आणि कर्णधार विराट कोहलीच्या झंजावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात विजय मिळवत मालिकेत 2-1 ने बाजी मारली.
  • ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं 287 धावांचं आव्हान भारताने 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
  • रोहित शर्माने 119 तर कर्णधार विराट कोहलीने 89 धावा केल्या.
  • तर तिसऱ्या सामन्यात कॅप्टन कोहलीने दमदार खेळीसह एक महत्त्वाचा विक्रम मोडला. त्याने केलेल्या 89 धावांच्या कामगिरीच्या जोरावर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार ठरला.
  • तसेच हा विक्रम आधी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावे होता. त्याच्या नावे कर्णधार म्हणून 11 हजार 207 धावा आहेत. त्यापुढे जात विराटने 11 हजार 208 धावा केल्या. या यादीत मोहम्मद अझरूद्दीन तिसरा तर सौरव गांगुली चौथा आहे.

दिनविशेष:

  • सन 1761 मध्ये थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या 16व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.
  • कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचा जन्म 21 जानेवारी 1882 मध्ये झाला होता.
  • गीतकार, लेखक आणि दिगदर्शक शांताराम आठवले यांचा जन्म 21 जानेवारी 1910 मध्ये झाला होता.
  • सन 1972 मध्ये मणिपूर आणि मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.