चालू घडामोडी (30 जानेवारी 2018)
गोखले यांनी स्वीकारला परराष्ट्र सचिवपदाचा कार्यभार :
- डोकलाम प्रश्न सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी विजय केशव गोखले यांनी परराष्ट्र सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. दोन वर्षांसाठी गोखले हा पदभार सांभाळतील.
- विजय गोखले हे 1981 च्या तुकडीतील भारतीय परराष्ट्र सेवेतील (आयएफएस) अधिकारी आहेत.
- गोखले यांनी हाँगकाँग, बीजिंग आणि न्यूयॉर्कमध्ये काम केले आहे. याशिवाय त्यांनी परराष्ट्र खात्यात उपसचिव (अर्थ), संचालक (चीन व पूर्व आशिया, सहसचिव (पूर्व आशिया) आदी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
पाणी झपाट्याने संपणार्या देशांचा यादीत भारताचा समावेश :
- जगातील अनेक देशांमध्ये पाण्याची कमतरता असून जवळपास 11 देश पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त असल्याचे नुकतेच समोर आले आहे.
- दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई असून याठिकाणचे वापरण्यायोग्य पाणी काही दिवसातच पूर्णपणे संपणार असल्याचे म्हटले जात आहे.
- याशिवाय ब्राझिल, इराण, कंबोडिया, मादागास्कर, चीन, सिंगापूर, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि लिबिया या देशांचा यादीत समावेश आहे.
- त्यामुळे या देशातील लाखो नागरिक अपुऱ्या आणि स्वच्छ पाण्याच्या समस्येला सामोरे जात आहेत.
- येत्या काळात या देशांना पाणी विकत घेणे आणि खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करणे यांसारखे उपाय करावे लागतील.
- भारत या यादीत सहाव्या क्रमांकावर असून याठिकाणीही अनेकदा दुष्काळी परिस्थिती निर्माण होते.
विश्वसनीयतेच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानावर :
- सरकारवरील विश्वसनीयतेच्या बाबतीत भारतानं जगामध्ये टॉप तीन मध्ये स्थान राखलं आहे.
- गेल्या वर्षी पहिल्या स्थानी असलेला भारत यंदा याबाबतीत थोडासा घसरला आहे.
- दरवर्षी दावोस येथून ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स जाहीर करण्यात येतो, त्यामध्ये हे निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे.
- नोटाबंदी व जीएसटीसारख्या सर्वसामान्यांना त्रासदायक ठरणाऱ्या योजना आणून देखील केंद्र सरकारवरील लोकांचा विश्वास ढळलेला नसल्याचे हा निर्देशांक सांगत आहे.
- पहिल्या दोन स्थानांवर चीन व इंडोनेशिया हे देश आहेत.
डॉ. हेपतुल्ला, आझाद यांना संसदीय पुरस्कार :
- भारतीय संसदीय गटाने (इंडियन पार्लमेंटली ग्रुप) तब्बल 5 वर्षांनी या वर्षी संसदेत भरीव कामगिरी करणार्यांचा सत्कार करण्याचे ठरविले असून, डॉ. नजमा हेपतुल्ला यांची राज्यसभेतील कार्यासाठी निवड झाली आहे.
- राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांची 2015 सालच्या कामगिरीसाठी निवड करण्यात आली असून,तृणमूल काँग्रेसचे सदस्य दिनेश त्रिवेदी (लोकसभा) यांची 2016 सालासाठी, तर बिजू जनता दलाचे भर्तुहारी मेहताब (लोकसभा) यांची 2017 सालासाठी निवड झाली आहे.
- हे पुरस्कार 1995 साली सुरू करण्यात आले होते आणि पहिला पुरस्कार माजी पंतप्रधान स्व. चंद्रशेखर यांना, तर त्यानंतरच्या वर्षांत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी व माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना देण्यात आले होते.
चीन CPEC प्रकल्पावरुन भारताबरोबर तडजोड करण्यास तयार :
- सीपीईसी प्रकल्पावरुन भारताबरोबर जे मतभेदांचे मुद्दे आहेत त्यावर चर्चेने तोडगा काढण्याची तयारी चीनने दाखवली आहे.
- चीन-पाकिस्तानमध्ये बनणारा 50 अब्ज डॉलरचा हा प्रकल्प पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार आहे. त्यावरुन दोन्ही देशांमध्ये काही मुद्यांवर मतभेद आहेत.
- चीनच्या सीपीईसी प्रकल्पाला पर्याय म्हणून भारताने इराणच्या चाबहारमध्ये बंदर विकसित केले आहे.
- इराण, भारत आणि अफगाणिस्तान या तिघांनी मिळून चाबहार बंदर विकसित केले आहे. चाबहार हे बंदर सिस्तान-बलुचिस्तान प्रांतामध्ये आहे.
- चाबहारचा इतिहास ख्रिस्तपूर्व 2500 वर्षांपासूनचा असून अलेक्झांडर, मंगोलांनीही येथे सत्ता गाजवलेली होती.
- भारत अफगाणिस्तान आणि इराण यांच्यामध्ये झालेल्या त्रिपक्षीय करारामध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
दिनविशेष :
- 1948 : नथुराम गोडसे याने मोहनदास करमचंद ऊर्फ महात्मा गांधी यांचा सायंकाळी 5 वाजून17 मिनिटांनी प्रार्थना करीत असताना गोळ्या घालून खून केला.
- 1999 : पण्डित रविशंकर यांना भारतरत्न जाहीर.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा