चालू घडामोडी (11 मार्च 2017)
नासाला सापडले भारताचे हरवलेले चंद्रयान-1 :
- भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्त्रो’ने 2008 मध्ये चंद्रावर भारताचे पहिले मानवरहित यान, चंद्रयान -1 पाठवले होते.
- चंद्राभोवती प्रदक्षिणा घेतल्यानंतर 2009 पासून त्याच्याशी इस्त्रोचा संपर्क तुटला. अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र, यामध्ये अपयश आल्यानंतर हे चंद्रयान हरवल्याचे घोषित करण्यात आले पण, आता ते सापडले आहे. संपर्क तुटण्याआधीच भारताच्या चंद्रयानाने चंद्रावर पाणी आहे असे सांगितले होते.
- अमेरिकेची स्पेस एजन्सी ‘नासा’ने चंद्रयान -1 सापडल्याचा दावा केला आहे. ते चंद्रयान अजूनही चंद्राला प्रदक्षिणा घालत असल्याचं नासाच्या वैज्ञानिकांनी सांगितले आहे.
- विशेष म्हणजे चंद्रयान पाठवताना ते केवळ 2 वर्ष हे या मोहिमेवर राहील अशी योजना आखण्यात आली होती. पण नासाने ते यान अजूनही चंद्राला प्रदक्षिणा घालत असल्याचे सांगितले आहे.
- चंद्राच्या पृष्ठभागापासून 200 किमी दूर अंतरावर हे चंद्रयान एका कक्षेत आहे असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. हे यान शोधण्यासाठी इंटर प्लानेटरी रडारचा वापर करण्यात आला. या रडारचा उपयोग लघुग्रहांचे निरीक्षण करण्यासाठी केला जातो.
- 22 ऑक्टोबर 2008 मध्ये श्री हरीकोटा येथून इस्त्रोने पहिल्या चंद्रयानाचे प्रक्षेपण केले होते. चंद्राच्या कक्षेत 3400 फे-या मारल्यानंतर ते 9 ऑगस्ट 2009 पासून गायब झाले होते.
वनडे क्रमवारीत एबी डिव्हिलिअर्स दुसर्यांदा अव्वल :
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जारी केलेल्या एकदिवसीय क्रमवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा धडाडीचा फलंदाज एबी डिव्हिलिअर्सने अव्वल स्थानावर कब्जा केला आहे.
- न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीच्या बळावर त्याने पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठले. या मालिकेत त्याने 262 धावा केल्या होत्या त्यामध्ये वेलिंगटन वनडेमध्ये केलेल्या 85 धावांच्या अप्रतिम खेळीचाही समावेश आहे. तर भारतीय कर्णधार विराट कोहली तिस-या स्थानावर कायम आहे.
- ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला डिव्हिलिअर्सच्या चांगल्या कामगिरीचा फटका बसला. वॉर्नरची दुस-या स्थानावर पिछेहाट झाली आहे.
- डिव्हिलिअर्सला 875 रेटिंग असून तिस-या स्थानावरील विराट कोहलीच्या तो 23 गुणांनी पुढे आहे तर वॉर्नरपेक्षा 4 गुणांनी पुढे आहे.
- तसेच या क्रमवारीत भारताचा रोहित शर्मा (12) आणि महेंद्र सिंह धोनी (13) आपल्या आधीच्या स्थानावर कायम आहेत.
राज्यसभेत शत्रू मालमत्ता विधेयक मंजूर :
- येथील संपत्ती सोडून पाकिस्तान व चीनमध्ये गेलेल्या लोकांना त्यावर दावा सांगता येणार नाही, अशी तरतूद असलेले शत्रू संपत्ती विधेयक राज्यसभेत मंजूर झाले, यावेळी सर्व विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.
- शत्रू संपत्ती (सुधारणा) विधेयक 2016 हे शत्रू सपंती कायदा 1968 मध्ये सुधारणा करून तयार केलेले नवे विधेयक असून राज्यसभेत ते आवाजी मतदानाने मंजूर झाले.
- विरोधकांनी विधेयकाच्या आराखडय़ावर पुढील आठवडय़ात सविस्तर चर्चा करण्याची मागणी केली होती. हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले होते. त्यानंतर राज्यसभेने ते एका समितीकडे पाठवले होते. त्यावर काही शिफारशी करण्यात आल्या होत्या, त्यानुसार त्यात अनेक सुधारणाही केल्या होत्या.
- सभागृहातील विरोधी पक्षनेते जयराम रमेश अनुपस्थित असल्याने यावरील चर्चा पुढील आठवडय़ात करण्यात यावी अशी विरोधकांची मागणी होती. पण सरकारने ते चर्चेला घेण्याचा हट्ट धरला. नंतर आवाजी मतदानाने ते संमत झाले. हा सुरक्षेचा प्रश्न असून 14 मार्चला हे विधेयक बाद होत आहे त्यामुळे त्यावर आताच चर्चा आवश्यक आहे, असे स्पष्टीकरण अर्थमंत्री व सभागृहाचे नेते अरूण जेटली यांनी केले.
- शत्रू संपत्तीला वारसा कायदा लागू होणार नाही व त्याचे हस्तांतरण ताबेदाराकडून शत्रूकडे किंवा संबंधितांक डे होणार नाही. एकदा ही मालमत्ता ताबेदाराने (सरकार) ताब्यात घेतली की मग संबंधित संस्था व व्यक्ती नंतरच्या काळात शत्रू या संज्ञेत राहिली नाही किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी ती मालमत्ता शत्रू मालमत्ता म्हणूनच गणली जाईल व परत केली जाणार नाही. शत्रू मालमत्तेची प्रकरणे हाताळण्यास दिवाणी न्यायालये व इतर अधिकाऱ्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे.
सीबीएसई बोर्डामध्ये दहावीसाठी सहा विषय अनिवार्य :
- सेंट्रल बोर्ड फॉर सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसईने) दहावीच्या मूल्यांकनाची पद्धत बदलली असून यापुढे पाच नव्हे तर सहा विषय शिकावे लागणार आहेत.
- सध्या सीबीएसईला दोन भाषा, विज्ञान, गणित, सामाजिक विज्ञान हे पाच विषय शिकावे लागतात. यापुढे एक व्यावसायिक विषय निवडावा लागणार आहे.
- तसेच ही नवी पद्धत 2017-18 पासून लागू केला जाणार आहे. राष्ट्रीय कौशल्य पात्रता संरचनेअंतर्गत एक व्यावसायिक विषय घ्यावा लागणार आहे, असे सीबीएसईने म्हटले आहे.
- जर एखादा विद्यार्थी विज्ञान, सामाजिक विज्ञान किंवा गणित या विषयामध्ये नापास झाला तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे गुण तो जोडून पुढील वर्गात प्रवेश मिळवू शकतो. जर एखाद्या विद्यार्थ्याला नापास झालेल्या विषयात पुन्हा परीक्षा द्यावी वाटत असेल तर तो ऑक्टोबरमध्ये पुन्हा परीक्षा देऊ शकतो. सहावा विषय म्हणून 13 विषयांपैकी एक विषय निवडावा लागणार आहे.
दिनविशेष :
- 11 मार्च 1886 मध्ये पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर ही पदवी मिळाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा