चालू घडामोडी (22 जून 2018)
भारताकडून अमेरिकेला प्रत्युत्तर :
- डाळी, पोलादासह अमेरिकेच्या 29 उत्पादनांवर जादा करआकारणी करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर जादा कर आकारल्याने भारताने हे पाऊल उचलले आहे.
- अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, अमेरिकेच्या उत्पादनांवर जादा करआकारणी 4 ऑगस्टपासून सुरू होईल. यामध्ये वाटाणा, चना, मसूर डाळ यांच्यावरील 30 टक्के कर आता 70 टक्के करण्यात येईल. डाळींवरील कर 30 टक्क्यांवरून 40 टक्के केला जाईल.
- अमेरिकेतून आयात होणाऱ्या अख्ख्या बदामावरील आयात शुल्क प्रतिकिलो 100 रुपयांवरून 120 रुपये करण्यात येईल. सोललेल्या बदामावरील आयातशुल्क प्रतिकिलो 35 रुपयांवरून 42 रुपये होईल.
- बोरिक ऍसिडवरील आयात शुल्क 17.50 टक्के करण्यात आले असून, फॉस्फरिक ऍसिडवरील आयातशुल्क 10 टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात आले आहे. पोलाद उत्पादनांवरील आयात शुल्क 15 वरून 27.50 टक्के करण्यात आले आहे. मागील आठवड्यात भारताने आयात शुल्कात 50 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार असलेल्या 30 उत्पादनांची यादी जागतिक व्यापार संघटनेला (डब्लूटीओ) दिली होती.
एनएसजी कमांडोंचे ‘मिशन काश्मीर’ :
- अमरनाथ यात्रेवर असलेले दहशतवादी हल्ल्याचे सावट तसेच जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी कारवाया लक्षात घेऊन ‘ब्लॅक कॅट कमांडो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॅशनल सेक्युरिटी गार्ड्सची (एनएसजी) एक तुकडी काश्मिरात रवाना करण्यात आली आहे.




- जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहीम तीव्र करण्यात आली असून या मोहिमेत खास प्रशिक्षित ब्लॅक कॅट कमांडोंना उतरवण्यात येणार आहेत. या कमांडोंची नियुक्ती काही कालावधीसाठी असेल, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.
- भाजपने जम्मू-काश्मीरमधील मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर राज्यातील सरकार गडगडले असून राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. दरम्यान, या घडामोडींनंतर तातडीने एनएसजी कमांडोंची काश्मीरमध्ये पाठवणी करण्यात आली आहे.
- तसेच याबाबतचा निर्णय आधीच केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला होता. काश्मिरात कमांडो पथक दाखल झाल्यानंतर हे सर्वात आधी त्यांना खडतर प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली जाणार आहे. जम्मू-काश्मीर पोलीस दलाच्या मोहिमांमध्ये हे पथक भाग घेईल.
सोलापूर महापालिकेचे परवाने ऑनलाइन :
- सोलापूर महापालिका आरोग्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या 161 व्यवसायांच्या परवाना शुल्कात 30 टक्के वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार परवाने देतानाच ते ऑनलाइन पद्धतीने देण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच हे सर्व परवाने ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. एप्रिल ते मार्च असा परवान्यांचा कालावधी असणार आहे.
- अधिनियमातील तरतुदीनुसार दरवर्षी मार्चमध्ये परवाने दिले जातात, तसेच मार्चमध्ये नूतनीकरणही करून दिले जाते. अन्न सुरक्षा व मानके कायदा अस्तित्वात आल्यापासून भेसळ प्रतिबंधक व आरोग्य परवानाविषयक कामकाज महापालिकेकडून काढून घेण्यात आले.
- तसेच त्यामुळे या परवान्यांपासून महापालिकेस मिळणारे उत्पन्न बंद झाले आहे. त्यामुळे शहरात सुरू असलेल्या तब्बल नवीन 52 व्यवसायांची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शुल्क आकारल्यास महापालिकेस वर्षाला अंदाजे 15 ते 20 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
डॉक्टर अतुल गवांदेंची उल्लेखनीय कामगिरी :
- वैद्यकीय क्षेत्रातील चुकांवर नेहमी आपल्या लिखाणाद्वारे बोट ठेवणारे प्रसिद्ध डॉक्टर आणि लेखक अतुल गवांदे यांच्या रूपाने भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
- ऍमेझॉन, बर्कशायर हॅथवे आणि जेपी मॉर्गन या जगातील दिग्गज कंपन्यांच्या भागिदारीतून सुरू होणाऱ्या नव्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) मराठमोळ्या गवांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


- सदर कंपन्या यानिमित्ताने आरोग्य क्षेत्रात पदार्पण करीत असून, आज संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. नव्या कंपनीचे कार्यालय अमेरिकेतील बोस्टन शहरात असणार आहे. कोणत्याही नफ्याची अपेक्षा न बाळगता अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
- गवांदे हे एक एंडोक्राईन सर्जन आहेत. सध्या ते ब्रिगहॅममध्ये महिलांसाठीच्या रुग्णालयात कार्यरत असून, ते हॉर्वर्ड टीएच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ अँड हॉर्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये प्राध्यापकाचे कामही करतात. त्यांनी 2014 मध्ये लिहिलेले ‘बीइंग मोर्टल: मेडिसिन अँड व्हॉट मॅटर्स इन द एंड‘ हे पुस्तक चांगलेच गाजले होते.
दिनविशेष :
- 22 जून सन 1757 मध्ये प्लासीची लढाई सुरू झाली.
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधुन बाहेर पडुन 22 जून 1940 रोजी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
- महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण 22 जून 1994 मध्ये जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकर्यात महिलांना 30 टक्के आरक्षण.
- अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी सुमारे 194 दिवस 18 तास पूर्ण करून सर्वाधिक काळ अंतराळात राहून 22 जून 2007 रोजी त्या पृथ्वीवर परत आले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा